परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात नुकसान होऊन गावची गावे पाण्यात गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी व सामान्य जनता प्रचंड अडचणीत आले आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) च्या परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ ॲाक्टोबर असून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) च्या परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.
तरी शासनाने धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणारया इयत्ता १० वी माध्यमिक शालांत परीक्षांचे आणि १२ वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे शुल्क माफ करून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.