📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन काही व्यक्तींनी संबंधित कुटुंबातील सदस्यांवर शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत कुटुंबातील सदस्य जखमी झाले त्यांना सरकारी दवाखान्यात प्रथम उपचार करून एक्स रे काढून घेतले त्याचबरोबर या प्रकारात महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या जबाबानुसार, आरोपींनी घरात घुसून मारहाण केली तसेच सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबी ता परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध दिव्यांग कलम 92 (ॲट्रॉसिटी कायदा)इतर कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दिव्यांग कुटुंबावर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपींना त्वरित अटक करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक संघटना दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र राज्य व दिव्यांग नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत जलदगतीने कारवाई करावी, अन्यथा जिल्ह्यातील दिव्यांग रस्त्यावर उतरतील , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
