कंडारी येथील मोतीराम जाधव हत्या प्रकरणाने धाराशिव जिल्हा हादरला; ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा आंदोलनाचा इशारा

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कंडारी येथे १५ डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने सोमवार दि.२२ डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्त परंडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत लॉंग मार्च काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा लॉंग मार्च धडकला यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्यावातीने शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर, जिल्हाउपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर ईटकर, बाबुराव काळे, भारत जाधव, देवराम सुकळे, अर्जुन पवार, उमेश सुकळे, अविनाश जाधव, शहाजी, पवार यांच्यासह मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंब, महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट….
नेमकी घटना काय?
सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास कंडारी येथील ३५ वर्षीय तरुण मोतीराम जाधव यांना त्यांच्याच गावातील विष्णू कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांनी ‘पार्टी’च्या बहाण्याने बोलावून नेले. जेवणाच्या ताटावरून उठवून नेल्यानंतर डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी केवळ हत्याच केली नाही, तर हा अपघात वाटावा यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुणे, माती टाकणे असे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही आरोपींनी केल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे.


‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे निवेदन
या घटनेच्या निषेधार्थ ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

चौकट….
प्रमुख मागण्या:

  • ​सदर खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
  • ​या हत्येचा तपास सी.आय.डी (CID) मार्फत करण्यात यावा.
  • ​मयत मोतीराम जाधव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि मुलांचे शिक्षण मोफत करावे.
  • ​पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
  • शासनाने या प्रकरणी तज्ज्ञ वकिलांची (Special Public Prosecutor) नियुक्ती करावी.

    चौकट…
    २६ जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा
    प्रशासनाने या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची लेखी माहिती २० जानेवारी २०२६ पर्यंत द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जर दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही, तर २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
error: Content is protected !!